"मानवता हाच धर्म खरा.."
अदृष्य भिंती तू का बांधतो रे..
अनायास मनुजा तू का भांडतो रे..
धर्म-जाति-रंग तू का मानतो रे..
परकीयां सारखा तू का नांदतो रे..
एक माय तुमची ती धरती बिचारी..
तिचे दुःख मर्म कधी जाणतो रे..
जळते धरा ती आतून दडपून..
तिच्या लेकराचे तू रक्त सांडतो रे..
अनाचार सगळा हा थांबव रे आता..
अहंकार खोटा हा पेटव रे आता..
नको भेद कसलाच पाळू मनी तू..
विचार समते चा तू पसरव रे आता..
किती ही जुने ते संस्कार असले..
त्यागून सगळ्यांनी एकत्र यावे..
स्व-बांधवांना विभाजित करी जे...
संस्कार त्यांना बरे का म्हणावे..
अज्ञानतेचा हा काळोख सगळा..
पुसाया सुरु हे आत्ताच करावे..
किती ही जरी धर्म असले जगी ह्या..
'खरा धर्म' हे मानवतेलाच म्हणावे..
-भूषण जोशी
No comments:
Post a Comment